निकृष्ट काम, बनावट नोंदी, ठेकेदार यांना अधिकची रक्कम – गावपुढारी, अधिकारी व ठेकेदार यांचे भ्रष्ट कांड
धाराशिव – समय सारथी
नळदुर्ग येथील बहुचर्चित घरकुल घोटाळा प्रकरणी लातुर येथील सब ठेकेदार सत्तार शेख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जी ठुबे यांनी फेटाळला आहे, त्यामुळे त्यांना पोलिस कधी अटक करतात हे पाहावे लागेल. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी यात सक्षमपणे बाजु मांडली. केंद्र सरकार पुरस्कृत गृह निर्माण झोपडपट्टी विकास योजनेअंतर्गत नळदुर्ग येथे मंजुर झालेल्या घरकुल योजनेत 3 कोटी 94 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या योजनेत प्राप्त निधीतुन 541 घरे बांधणे अपेक्षित होते मात्र त्यातील 145 घरांचे काम हे निकृष्टरित्या करण्यात आले, त्यात 100 घरे पडण्याजोगे व 45 घरांचे काम अर्धवट होते. तत्कालीन नगराध्यक्ष, अधिकारी व ठेकेदार यांनी संगममत करुन अपहार केला.
ठेकेदार यांना काम मिळाल्यानंतर त्यांनी ते काम सबठेकेदार यांना दिले, या गुन्ह्यात ठेकेदार व सबठेकेदार यांनाही आरोपी करण्यात आले. आमचा याच्याशी संबंध नाही असा पवित्रा घेत शेख यांनी कोर्टात अटकपुर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला त्यावर सुनावणी होऊन जामीन फेटाळला. सब ठेकेदारही तितकेच दोषी असुन त्यांनी सरकारी रकमेचा अपहार केला, निकृष्ट काम केले त्यामुळे त्यांची जबाबदारी तितकीच आहे. गुन्ह्यांचे गंभीर स्वरूप पाहता तपासासाठी आरोपीची पोलिस कोठडी गरजेची आहे त्यामुळे जामीन नाकारावा असा युक्तिवाद ऍड देशमुख यांनी केला. आरोपींचा सहभाग, गुन्ह्याचे स्वरूप, अपहार करुन सरकारसह लोकांची केलेली फसवणुक लक्षात घेता जामीन नाकारला.
2019 साली गुन्हा दाखल झालेल्या 3 कोटी 94 लाख रुपयांच्या या घरकुल घोटाळ्यात 11 जन आरोपी असुन त्यात तत्कालीन नगराध्यक्ष उदय जगदाळे, नगराध्यक्षा निर्मला गायकवाड, उप नगराध्यक्ष नय्यरपाशा जहागीरदार, मुख्याधिकारी दिलीप देशमुख, नगर अभियंता अब्दुल रेहमान खान यांच्यासह मिनार कन्सट्रकशन, साया इंजीनिअर्स व इतर सब ठेकेदार आरोपी आहेत. पोलिसांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे हे तपास करीत आहेत.
नळदुर्ग येथे घरकुल योजनेसाठी 9 कोटी 22 लाख 95 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता, त्यातून जी घरे बांधण्यात आली ती निकृष्ट दर्जाची होती. तांत्रिक समितीच्या दरानुसार परीगणना केली असता त्याची बांधकाम किंमत 6 कोटी 79 लाख इतकी असतानाही ठेकेदार यांना अधिकचे 3 कोटी 94 लाख देण्यात आले. यात मीनार कन्सट्रकशनचे मोहमदी बेगम काझी यांना 1 कोटी 52 लाख तर संजय सुधाकर राजहंस लातुर यांना 90 लाख 97 हजार अधिकचे देण्यात आले. 145 घरांचे काम निकृष्ट असल्याने त्याचे मुल्यमापन 1 कोटी 50 लाख इतके होते, ती रक्कम अपहरीत धरण्यात आली आहे.
ठेकेदार यांनी काम न करता त्यांना करोडो रुपयांची अधिकचे रक्कम देण्यात आली. नगरपरिषदेतील अधिकारी यांनी मोजमाप पुस्तिकेत बनावट नोंदी घेतल्या. निकृष्ट काम झालेले असतानाही बिले देण्यात आल्याचा ठपका जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्या चौकशी समितीने ठेवला होता त्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसात 1 डिसेंबर 2019 रोजी कलम 420,468,471,409,406, 34 सह गुन्हा नोंद झाला होता. यातील काही आरोपींचा जामीन झाला असुन काही आरोपी अजूनही फरार आहेत.