धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर पालिकेअंतर्गत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याबाबत विशेष तपास पथकाची स्थापना होऊन 1 वर्ष उलटले तरी अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारची चौकशी किवा कारवाई न झाल्याने एसआयटीच्या कामकाजासाठी एक नोडल ऑफिसर नियुक्त करावे असे पत्र आमदार सुरेश धस यांनी पोलिस अधीक्षक यांना दिले आहे. या पत्रानंतर 27 कोटी अपहाराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, यात चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी धस यांनी केली आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनानंतर एसआयटीची घोषणा केली होती.
6 जुलै 2020 ते 21 नोव्हेंबर 2022 या 28 महिन्यात 27 कोटी 34 लाख रुपयांच्या विकास कामाच्या बिलात अपहार झाला असुन तो दडवण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी व इतरांनी संगनमत केल्याची तक्रार नगर परिषदेने दिली होती त्यानंतर कलम 420,409,201, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपहार, फसवणूक, पुरावा नष्ट करणेसह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 चे कलम 9 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. विविध विकास योजना व इतर खर्चाची 27 कोटी 34 लाख रुपयांची 514 प्रमाणके म्हणजे व्हाऊचर गहाळ करुन अपहार प्रकरणाचा तपास सुरु आहे.
आमदार सुरेश धस यांनी नगर परिषदेतील तक्रारी अनुषंगाने चौकशीची मागणी केली होती याबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली त्यात करोडो रुपयांची प्रमाणके गायब असल्याचे समोर आले.
चौकशी समितीच्या अहवालानुसार 1 हजार 88 प्रमाणके गायब होती त्यात शासकीय देयके, विद्युत देयके, शासकीय कर, लाभार्थी, वेतन मानधन व इतर कर असे शासकीय खर्च केलेले 574 देयके आणि ठेकेदार, विकास योजना व किरकोळ खर्चाची 514 देयके अशी वर्गवारी करून अहवाल सादर करण्यात आला, यातील अनेक देयके गायब आहेत तर अनेक विकास कामे निकृष्ट आहेत त्यामुळे कर्मचारी व ठेकेदार रडारवर आहेत, त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.