योगायोग की कुटील डाव ? केला ‘विरोध’ झाला आरोप, ‘कशात जीव गुंतला’ – राजकीय स्वार्थाची किनार
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर विधानसभा निवडणुकीपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, त्या बैठकीत माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर गेल्या 5 वर्षात कोणताही विकास न केल्याचे आरोप केला आहे. कागदावर नुसत्या पोकळ घोषणा झालेल्या आहेत. मी उघड उघड स्वतःच्या पक्षाच्या विद्यमान आमदारावर आरोप करतो आहे. 5 वर्षात आपण खुप मागे आलो आहोत, कागदावर फक्त घोषणाचा पाऊस पडलेला आहे. कोणताही निधी आलेला नाही. त्यासाठी आपल्या टीममधुन कोणीतरी एकाला आमदारकीला उभे करणे व आमदार बनविणे गरजेचे आहे व तसा निर्णय आम्ही केला आहे. तुळजापूरचा विकास आमच्या टीमने, विशेष म्हणजे पिटू भय्या गंगणे यांनी विकास करुन दाखवला, उलथापालथ करुन दाखवली त्याचं पद्धतीने आता तालुक्याचा विकास साधायचा आहे आणि विकास होण्यासाठी आमदार होणे गरजेचे आहे. पिटू भय्या आमदार व्ह्याच नको म्हणाले म्हणुन आपणं दुसरे नाव घेतलं आहे त्यांची इच्छा नाही पण त्यांना आम्ही बळजबरीने तयार केले आहे असे त्या व्हिडिओत आहे.
विनोद उर्फ पिटू गंगणे यांच्या नेतृत्वात ही बैठक घेण्यात आली होती, त्यात तुळजापूर शहराची राजकीय धुरा संभाळणारी काही नेतेमंडळी उपस्थितीत होती. अश्या अनेक बैठका विधानसभावेळी झाल्या होत्या त्यात खालच्या स्तरावर टीकाही झाली होती. आपल्या टीममधील हक्काचा माणुस ‘आमदार’ म्हणुन हवा आहे, असा या बैठकीचा सुर होता. मनोज जरांगे पाटील यांच्याकडुन या गटाने विधानसभेची उमेदवारी मागितली होती मात्र निवडणुक न लढण्याचा निर्णय झाला. त्यानंतर बरीच राजकीय उलथापालथ झाली. पर्याय नसल्याने व आमदार पाटील यांनी ‘मनधरणी’ केल्यानंतर स्वतंत्र ‘संस्थान’ असलेला हा महत्वकांक्षी ‘गट’ त्यांच्या सोबत गेला, त्यातील काही जणांनी चार हात अंतर ठेवले, काही जन शांत ‘अलिप्त’ तर काहींनी राजकीय खिंडीत गाठले.
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी 15 एप्रिल रोजी कोर्टात 10 हजार 744 पानाचे चार्जशीट दाखल करताना माजी नगराध्यक्ष संतोष उर्फ मेंबर परमेश्वर कदम यांना आरोपी केले, या गुन्ह्यातील ते 36 क्रमांकचे आरोपी असुन ड्रग्ज तस्कर गटात मोडतात. 21 फरार आरोपीत संतोष कदम परमेश्वर यांचा समावेश असुन पोलिस शोध घेत आहेत.
तत्कालीन स्तिथीत विरोध करणाऱ्या मंडळीपैकी काही जन तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात आरोपी आहेत (त्यांचे समर्थन किंवा सहानभुती नाही) हा निव्वळ योगायोग की कुटील राजकीय षडयंत्राचा भाग असाही आरोप होत आहे. एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची व विरोध केला तर काय होऊ शकते (वाचवले व कायदेशीर गोत्यात आणले) हा सुचक संदेश दिल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे, त्यात हा संशोधन व चिंतनाचा विषय आहे.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना तुळजापूर येथील ड्रग्ज स्तिथीची पुरेपूर माहिती होती, काही नागरिक, पत्रकार यांनी त्यांना भेटून कल्पना दिली होती त्यावर ते म्हणाले होते की, मी काही चुका दुरुस्त केल्यात. आपणं काय ते पाहु, तुमच्याकडे माहिती असेल तर मला द्या. या घटनेनंतर जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त काळ ते शांत राहिले, लोकसभा व विधानसभा निवडणुका सुरळीत पार पडल्या. आमदार पाटील यांच्यावर याचं भुमिकेवर खासदार ओमराजे यांनी संशय व्यक्त करीत आरोप केला आहे. जनतेच्या हितासाठी की निवडणुकीच्या स्वार्थासाठी थांबलात ? विधानसभेचा हेतू साध्य झाला की डाव साधला. मग इतके दिवस ते का शांत होते? कशाचा ‘अभ्यास’ व मुहूर्ताची वाट पाहत होते असा प्रश्न ओमराजे यांनी केला आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी गेल्या 2-3 महिन्यात ठोस माहिती दिली, ट्रॅप लावले, आरोपी पकडून दिले मात्र काही जन कांगावा करीत आहेत. ज्यांनी माहिती दिली त्यांच्याबद्दल आदराची, उपकृत भावना असायला हवी असे आवाहन आमदार पाटील यांनी जनतेला केले आहे. आगामी काळात एखाद्याचा जिवंतपणी पुतळा किंवा एखाद्या रस्त्याला ‘…….. ड्रग्जमुक्ती मार्ग’ नाव देत उद्धार करण्याची सुपीक कल्पना पीपीटीसह प्रत्यक्षात अवतरु शकते असा विश्वास यानिमित्ताने काहीजण व्यक्त करीत आहेत. आमदार निधी वापरता येतो अशी तरतूद आहे, त्यामुळे चांगभलं..
एखाद्याची भक्कम पाठराखण करणे हा त्यांचा मुळ स्वभाव नाही मात्र यात ‘कशात जीव गुंतला’ आहे याची चर्चा त्यांच्या निकटवर्तीयात होत आहे. आरोप प्रत्यरोपाच्या या वादळात आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे ‘पीक विमा’ प्रमाणे ‘ड्रग्ज’ स्पेशालिस्ट आमदार म्हणुन ओळखू लागले आहेत.