धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदीर मठाना देण्यात आलेळ्या जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते त्यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चौकशी समिती गठीत केली आहे. अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असुन त्यात सदस्य सचिव म्हणुन धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे असणार आहेत. सेवा करण्यासाठी मठाना जमिनी दिल्या आहेत मात्र त्याचा शर्तभंग झाला असुन व्यक्तीक कामासाठी वापर सुरु आहे.
महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापुर येथील हजारो एकर इनाम जमिनींच्या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करुन, मुळ सुत्रधारांवर कठोर कारवाई करणे व देवस्थानची सर्व जमीन तातडीने मंदिराच्या ताब्यात घेण्याबाबतचे निवेदन महसूलमंत्री यांना दिले होते. या निवेदनातील मुदयांच्या अनुषंगाने सर्व अभिलेख्यांची पळताळणी करुन सखोल मुद्देनिहाय चौकशी करून अहवाल 15 दिवसाच्या आत सादर करावा असे आदेशीत केले आहे.
मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी निवेदन देऊन अनेक गंभीर आरोप केले आहेत. तुळजाभवानी देवीच्या मठाना निजाम सरकारने दिलेल्या इनाम जमिनी नियमबाह्यरीत्या खासगी व्यक्तींच्या नावे हस्तांतरित झाल्या आहेत. निजाम सरकारने 4 हजार 121 एकर जमीन इनाम म्हणून दिली होती. कायद्यानुसार या जमिनीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही. याला ‘कुळ कायदा’ ही लागू होत नाही. असे असतानाही तत्कालीन महसूल अधिकारी आणि अन्य व्यक्तींच्या संगनमताने हजारो एकर जमीन लाटण्यात आल्याचा मंदिर महासंघाचा आरोप आहे.
श्री तुळजाभवानी संस्थानच्या नावे कागदोपत्री 3 हजार 397 एकर भूमी असताना प्रत्यक्ष ताबा मात्र 4 मठांमधील खासगी व्यक्तीकडे आहे. तसेच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली 403 एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खासगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली. हस्तांतरणात सामील असलेले तत्कालीन उपजिल्हाधिकारी, विश्वस्त आणि संबंधित लोकांवर तातडीने गुन्हे दाखल व्हावेत.
63.03 एकर जमिनीपैकी काही जमीन ‘संरक्षित कुळ’ दाखवून अनधिकृतपणे विकण्यात आली आहे. एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत 261 एकर जमीन तब्बल 73 खासगी व्यक्तींच्या नावे 7/12 वर नोंदवली. याशिवाय, अपसिंगा आणि उपळा या गावांमधील 158 एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आल्याचा दावा मंदिर महासंघाचा आहे.










