धाराशिव – समय सारथी
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख आणि डोळ्यांतील अश्रू पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे., “मायबाप सरकारने तात्काळ ठोस मदत न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल,” असा थेट इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.
आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील शेलगाव (ज), सातेफळ, वाघोली यासह अनेक गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
आमदार पाटील म्हणाले की , “पाहणी वेळी प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख, त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि भविष्यातील अनिश्चितता स्पष्टपणे जाणवत आहे. जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतपिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, जनावरांसाठी चारा शिल्लक नाही. अनेकांची घरे आणि संसार उद्ध्वस्त झाले आहेत, ज्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.
सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, अशा गंभीर परिस्थितीतही मायबाप सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही, हे अत्यंत दुःखद आणि संतापजनक आहे. आणखी किती हानी झाल्यावर सरकारच्या यंत्रणेचे डोळे उघडणार, हा मोठा प्रश्न आहे. दौऱ्यानंतर आमदार पाटील यांनी शासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मदतीत दुजाभाव का?
ऑगस्टमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धाराशिव जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात मदत देऊ केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप ही मदत का दिली नाही असा प्रश्न आमदार पाटील यांनी सरकारला विचारला आहे. मदतीच्या बाबत सुद्धा हे सरकार दुजाभाव करत असल्यामुळे त्यांचं शेतकऱ्यांप्रती असलेलं ढोंगी प्रेम लक्षात येत आहे असंही पाटील यांनी म्हटले आहे.