‘माऊली’ नंतर ‘सावली’ माघार घेणार का ? सकारात्मक मार्ग निघेल, शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना भाजप महायुती, जागावाटप व शिवसेनेचच्या जागेवर भाजप उमेदवार यांना उमेदवारी देण्यात येण्याच्या मुद्यावरून नाराजी व घमासान सुरु आहे. शिवसेनेचे एबी फॉर्म भाजपने त्याच्या पदाधिकारी यांना वाटले त्यामुळे शिवसैनिक संतप्त आहेत.
गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांची बंगल्यावर भेट घेतली. शिवसैनिक यांच्या भावना तीव्र असुन त्या चर्चेदरम्यान मांडल्या असुन काही ठिकाणी उमेदवारी बदलाचे संकेत पालकमंत्री यांनी पत्रकार यांच्याशी बोलताना दिले.
‘माऊली’ म्हणत भाजपने अर्चना राणाजगजीतसिंह पाटील ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील असा दावा करीत सोशल मीडियावर कॅम्पेनिंग केले होते, त्यांनी तेर व केशेगाव या 2 गटात भाजपकडुन उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र तूर्तास त्या निवडणुक लढणार नसल्याची भुमिका आहे. ‘माऊली’ यांनी माघार घेतल्यानंतर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासोबत ‘सावली’ सारखे असणारे नेताजी पाटील शिवसैनिकांच्या दबावामुळे माघार घेणार का ? हे पाहावे लागेल.
नेताजी पाटील हे भाजपचे पदाधिकारी असुन त्यांना शिवसेनेच्या जागेवर पळसप जिल्हा परिषद गटात उमेदवारी देण्यात आली आहे. ते शिवसेना पक्षाचे व गटातील नसल्याने शिवसैनिक यांचा तीव्र विरोध आहे. शिवसेना तालुका प्रमुख अजित लाकाळ यांची उमेदवारी निश्चित होती मात्र एबी फॉर्म भाजपला दिल्याने त्यांनी नेताजी यांना उमेदवारी दिली, बी फॉर्मवर लाकाळ यांचे नाव असल्याने त्यांना आशा आहे.आम्ही लपून छपून भेटत नाही, आम्ही भेटलो ही वस्तुस्तिथी आहे. धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीची सत्ता यावी यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. शिवसैनिक यांनी माझ्या समोर भावना व्यक्त केल्या त्या मी मांडल्या. काही ठिकाणी बदल करावे लागतील असे मी सांगितले. आमची झालेली चर्चा काही प्रमाणात यशस्वी झाली त्यानंतर मी पुन्हा जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, इतर पदाधिकारी व शिवसैनिक यांच्याशी चर्चा करणार आहे, त्यातून मार्ग निघेल व प्रचाराची दिशा ठरवून महायुतीला जास्तीत जास्त यश मिळेल.
शिवसेना व भाजप युतीचा फॉर्मुला ठरलेला असुन त्यात बदल होणार नाही. भुम परंडा वाशी मतदार संघातील 13 जागा व इतर उर्वरित 3 विधानसभा मतदार संघात 10 अश्या 55 पैकी 23 जिल्हा परिषद जागा शिवसेना लढणार आहे. भुम परंडा विधानसभा मतदार सांगत 26 जागा व इतर मतदार संघात 24 अश्या 50 पंचायत समिती जागा शिवसेना महायुती म्हणुन लढणार आहे. हे धोरण मुंबई येथे ठरले असुन काही ठिकाणी दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म दिले आहेत. काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे ते आम्ही चर्चा करून शमवणार आहोत.
शिवसैनिक यांच्यावर अन्याय होणार नाही, काहींना स्वीकृत तर काहींना शासकीय समिती, महामंडळ दिले जाईल त्यासाठी मी पालकमंत्री म्हणुन, राजन साळवी संपर्क प्रमुख म्हणुन शब्द देतील, जेणेकरून निवडणुका सुरळीत पार पडतील. आमची चर्चा सुरु असुन भाजप त्यांच्या लोकांशी चर्चा करीत आहे, आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करीत आहोत. समनव्याने तोडगा निघणार आहे, जो वाद विवाद झाला होता तो मी पालकमंत्री यां नात्याने शमवण्यासाठी प्रयत्न करणार त्यात 100 टक्के यश येईल याची खात्री आहे.
जागा वाढणार नाहीत, मुंबई जे धोरण ठरले तेच अंतीम असणार आहे. काही ठिकाणी त्यांच्या लोकांनी तर काही ठिकाणी आमच्या लोकांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्या भावना आहेत, शिवसैनिक म्हणुन त्यांना मानाचे स्थान देऊ, ती जबाबदारी माझी आहे असे ते म्हणाले. सरनाईक – पाटील यांच्या बैठकीतुन काय साध्या होणार हे 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत कळणार आहे.












