धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी या दुहेरी हत्याकांड खटल्यात मुख्य संशयीत आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वतीने त्यांचे वकील भुषण महाडिक यांनी अंतीम युक्तीवाद मांडायला सुरुवात केली आहे. महाडिक हे तोंडी युक्तीवाद कोर्टात मांडत असुन त्यानंतर ते लेखी म्हणणे सादर करणार आहेत. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल वेळेत द्यावा असे आदेश दिल्याने दररोज सुनावणी होत आहे, उद्या 18 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असुन डॉ पाटील यांचा उर्वरित युक्तीवाद सादर करतील
सरकार पक्षाच्या वतीने सीबीआय व तक्रारदार / याचिकाकर्ता आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने लेखी युक्तीवाद सादर झाल्यानंतर आता डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींच्या वतीने अंतिम युक्तिवाद राहिला आहे. हा खटला अंतीम टप्प्यात आहे. मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात होणार आहे.
सीबीआयच्या वतीने ऍड एजाज खान, आनंदीदेवी निंबाळकर यांच्या वतीने ऍड पी एम गवाड तर डॉ पाटील वगळता इतर 8 आरोपीच्या वतीने ऍड नेहा सुळे ह्या बाजु मांडत आहेत. राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री तथा तत्कालीन खासदार डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने 20 ऑगस्ट 2009 रोजी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात केला आहे. आरोपी पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार आहे.
पवनराजे निंबाळकर यांची 3 जुन 2006 रोजी हत्या झाल्यानंतर त्याचा तपास महाराष्ट्र पोलिस, सीआयडी त्यानंतर सीबीआयने केला. आनंदीदेवी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने हा तपास 23 ऑक्टोबर 2008 रोजी सीबीआयकडे वर्ग केला त्यानंतर सीबीआयने 7 महिन्यांनी पारसमल जैन याची मुलगी वर्षा हिच्या पत्रानंतर 25 मे 2009 रोजी गुन्ह्याची उकल केली. हत्याकांडनंतर तब्ब्ल 3 वर्षांनी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांना आरोपी करीत अटक केली.
माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे संशयीत आरोपी आहेत.