धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या कला केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना दिले आहेत. कला केंद्र यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असला तरी काही कला केंद्र छुप्या पद्धतीने सुरु असल्याचे समोर आले आहे अश्या कला केंद्रावर कारवाईचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी कला केंद्र परवाना रद्द केला असला तरी काही केंद्राना सील ठोकण्यात आले नाही, काही ठिकाणी कला केंद्राच्या रूमना सील नाही. स्थानिक प्रशासन यांच्याशी हात मिळवणी करीत काही कला केंद्र राजरोसपणे सुरु आहेत. कला केंद्र व तेथील गैरप्रकार बाबत पालकमंत्री सरनाईक यांना विचारले असतात त्यांनी भुमिका स्पष्ट करीत असे एकही कला केंद्र सुरु होणार नाही असे म्हणाले.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना याबाबत सक्त सुचना देणार आहे. कोणत्याही प्रकारे चुकीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. सर्वसामान्य तरुणाचा जीव वेठीस धरू देणार नाही, अनेक तरुण हे कला केंद्रच्या जाळयात अडकून बरबाद झाले आहेत तर काही ठिकाणी आत्महत्या केल्याच्या घटना झाल्या आहेत. हत्या, हाणामारीसह इतर प्रकार नित्याचे झाले आहेत.
काही पक्षीय पदाधिकारी हे कला केंद्र सुरु व्हावेत यासाठी पालकमंत्री यांना भेटून शिफारस करीत असल्याची चर्चा होती अश्या पदाधिकारी यांचे सरनाईक यांनी कान टोचले होते. अशी शिफारस घेऊन कोणत्याही राजकीय पक्षातला पदाधिकारी, कार्यकर्ता आला तर त्याला केराची टोपली दाखवण्यात येईल असे म्हणत त्यांनी कला केंद्र बाबत ठोस भुमिका स्पष्ट केली.
कला केंद्र व तिथली सद्य स्तिथी याचा आढावा घेण्यात येऊ शकतो. मध्यंतरी महसूल व पोलिस विभागाच्या कारवाईत काही कला केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द केलेले असतानाही ते सुरु असल्याचे समोर आले. जवळपास 40 ते 50 महिला तिथे सापडून आल्या, यासह अन्य बाबी समोर आल्या, याचा सविस्तर अहवाल तहसीलदार जिल्हाधिकारी यांना देणार आहेत. कला केंद्र जागा, बांधकाम व इतर कागदपत्रे याची प्रत्यक्ष स्थळ पाहणीची मागणी होत आहे. यां कला केंद्र यांना स्थानिक नागरिक, महिलांचा मोठा विरोध आहे.
तुळजाई, पिंजरा, साई, गौरी व कालिका असे 5 केंद्रचे परवाने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द केले आहेत. त्यातील काही जणांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील केले, त्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती दिली. जिल्हा प्रशासन अश्याची तपासणी व अहवाल मागवला आहे. महाकाली हे एकमेव केंद्र सुरु आहे या केंद्रचा परवाना रद्द करण्याचा पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला असुन या कला केंद्र बाबत प्रकरण उच्च न्यायालयात सुरु आहे. तिथे शपथपत्र दिले असुन तारीख पे तारीख सुरु आहे.












