धाराशिव – समय सारथी
भूम पंचायत समितीतील 2 कर्मचाऱ्यावर झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणी धाराशिव पोलिसांच्या तपासाला गती आली आहे. एका सरपंच व राजकीय नेत्याचे नाव समोर आल्याची सूत्रांची माहिती असुन सुपारी देऊन हा हल्ला घडवून आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी यात आजवर 3 आरोपीना अटक केली असुन एक आरोपी अल्पवयीन आहे. आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातुन हा हल्ला झाला आहे. सुपारी देणारा मास्टर माईंड पोलिसांच्या रडारवर आहे.
भुम पंचायत समितीतील रोहयो विभागातील कर्मचारी रवींद्र राख व कृष्णा बांगर यांची गाडी अडवून 9 सप्टेंबर रोजी हल्ला केला होता. त्यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलिस ठाण्यात गुरन 290/2025 कलम 109 (1),115 (2), 118 (1) 351 (3),3 (5) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणारे सर्व 3 आरोपी अटकेत आहेत.
दोघे कर्मचारी काम आटोपून बोलेरो गाडीतून घराकडे निघाले होते. या दरम्यान काही अंतर दूर गेल्यानंतर ईट आंदरूड रस्त्यावर बाईकवरून आलेल्या काही अज्ञातांनी त्यांची गाडी रोखली होती. गाडी रोखल्यानंतर अज्ञातांनी काहीतरी विचारण्याच्या बहाण्याने दरवाजा उघडायला लावताच दोघांना बाहेर ओढून काढत लाठ्या काठ्यांनी या दोघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर रवी राख व कृष्णा बांगर हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले होते.
पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व वाशी पोलिस निरीक्षक संग्राम थोरात यांनी कारवाई करीत 3 आरोपीना अटक केली. भुम येथील सलमान पठाण व हाडोंगरी येथील रितेश अंधारे यांना येरमाळा उड्डाणपुलाच्या खालून ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्ह्या संदर्भात अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन त्यांचे अन्य साथीदारांची माहिती दिली.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार,पोलीस हावलदार शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, फरहान पठाण, दयानंद गादेकर, चालक पोलीस अंमलदार नागनाथ गुरव, रत्नदीप डोंगरे, प्रकाश बोईनवाड यांचे पथकाने केली आहे.