धाराशिव – समय सारथी
प्रेम प्रकरणातून भूम तालुक्यातील पाथुड येथील एका १८ वर्षीय तरुणास बेदम मारहाण करण्यात आली आहे. क्रूरतेचा कळस गाठत सात ते आठ जणांनी रॉड, काठी तसेच तीक्ष्ण हत्याराने मारहाण केल्यानंतर तरुण मृत झाल्याचे समजून त्यास रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना आहे. हा तरुण सोलापूर येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून, याप्रकरणी परंडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. भूम तालुक्यातील पाथरूड येथील माउली बाबासाहेब गिरी असे अमानुष मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी परंडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार 3 मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास माउलीचा त्यास परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप व इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड, काठीने जबर मारहाण केल्याचा फोन आला होता. यानंतर त्यास फोन केला असता तो सातत्याने बंद लागत होता. यामुळे बस प्रवासात फिर्यादी वडिलांनी त्यांचे भाऊ व मित्राला याबाबतची माहिती देऊन शोध घेण्याची विनंती केली. दरम्यान, सायंकाळी 5 वाजता काळेवाडी येथील पोलिसपाटलांनी बाबासाहेब गिरी यांना फोन करून त्यांचा मुलगा माउली यास जबर मारहाण करून त्यास विवस्त्र पश्चिम पांढरेवाडी ते कोकणे वस्ती रस्त्यालगत फेकून दिल्याचे सांगितले. यावरून माउलीला जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतरही सुधारणा होत नसल्याने त्यास सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान, याबाबत बाबासाहेब गिरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून परंडा ठाण्यात आरोपी सतीश जगताप व अन्य सहा ते सातजणांवर गुन्हा दाखल करून यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.